नसरापूरच्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी अभाविप आक्रमक आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्या - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे निदर्शने
जनसंघर्ष न्यूज
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने महात्मा गांधी स्मारक येथे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या बलात्कार व निर्घृण हत्येचा अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांच्या नेतृत्वात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला जखम करून गेली आहे. घरासमोर निरागसपणे खेळणाऱ्या त्या चिमुकलीला आरोपीने फसवून गोठ्यात नेले, तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि नंतर तिची निर्दयी हत्या करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले दुःख नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेला हादरा देणारी आहे. शिक्षण, संस्कार आणि पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात एका चार वर्षांच्या मुलीला देखील सुरक्षितता मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद बाब आहे.
अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. त्या चिमुकलीच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर जे दुःख कोसळले आहे, त्याची कल्पनाही असह्य आहे. एका निष्पाप मुलीची स्वप्ने, तिचे बालपण आणि तिच्या कुटुंबाचा आनंद एका विकृत मानसिकतेने हिरावून घेतला आहे. आज संपूर्ण राज्यभरातून उमटणारा संताप हा फक्त भावनिक नाही, तर व्यवस्थेला जागे करणारा आक्रोश आहे. नसरापूर परिसरात नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलने झाली, महामार्ग रोखण्यात आले आणि "चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे" ही भावना सर्वत्र व्यक्त झाली आहे. आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळेत कठोर कारवाई झाली असती, तर कदाचित आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला असता, त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपीलाच नव्हे, तर अशा गुन्हेगारांना मोकळे रान मिळू देणाऱ्या व्यवस्थेचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.
अभाविपची ठाम मागणी आहे की, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) निष्पक्ष आणि वेगवान तपास करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करावे. तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक परिसर, गाव आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे.
अशा घटनांमधील आरोपीचा आणि त्यांच्या विकृत प्रवृत्तीचा निषेध करावा तितका कमीच आहे, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषी व्यक्तीला फाशी शिक्षा देण्यात यावी, आज समाजातील प्रत्येक घटकाने राजकारण, जात, पक्ष आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून अशा विकृत प्रवृत्तीविरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. मुलीची सुरक्षा, सन्मान आणि न्याय हा कोणत्याही समाजाचा मूलभूत पाया असतो. त्या पायालाच हादरे देणाऱ्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायम रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे आवाज उठवत राहील, असे मत अभाविप धुळे शहरमंत्री मयुरी जाधव यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव, मयुरी ढिवरे, मनिष कुलकर्णी, जयेश मोरे, केदार जोशी, प्रिया जैन सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
