विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे- अभाविप
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, यासह आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे, शाळा, महाविद्यालये, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत अभाविपच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. पूरग्रस्त शाळा-महाविद्यालयांचे नुकसान भरून काढण्यात यावे. विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके विनामूल्य द्यावीत.
2. अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करण्यात यावे.
3. परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्यात याव्यात.
4. पूरग्रस्त भागांतील स्पर्धा परीक्षा फॉर्म शुल्क माफ करून सरसकट फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी.
5. "कमवा व शिका" योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.
6. नष्ट झालेली शैक्षणिक कागदपत्रे विनाशुल्क पुन्हा उपलब्ध करून द्यावीत.
7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य आर्थिक मदत देण्यात यावी.
8. पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सुविधा, स्वच्छता मोहीम आणि औषधोपचार त्वरीत उपलब्ध करून द्यावेत.
विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पुरग्रस्त कुटुंबांना योग्य आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करत दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अभाविप धुळे शहर मंत्री मयुरी जाधव यांनी केली आहे.
यावेळी धुळे जिल्हा संयोजक लहानु कोळेकर, सहमंत्री कृष्णा वाघ, हर्षल शिरसाठ, जयेश पाटील उपस्थित होते.

