दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली'; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.
धुळे, दि. ७ (प्रतिनिधी): धुळे शहरातील वाढते अवैध धंदे, गुंडगिरी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची भेट घेऊन युवासेना राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात धुळे शहरातील सट्टा, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू अड्डे व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष स्कॉड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर सातत्याने देखरेख ठेवणे, गुंडांची परेड घेणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे आणि समाजकंटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणीही करण्यात आली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत असल्याने त्यांच्यावर आवश्यक निर्बंध घालावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक अधिक सक्रिय करावे तसेच छेडछाडीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या "कायद्याचा बालेकिल्ला" या मोहिमेच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही विशेष मोहीम राबवून अवैध धंदे, गुंडगिरी आणि समाजकंटकांविरोधात सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी ॲड. पंकज गोरे यांनी केली.
यावेळी ॲड. पंकज गोरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार केला. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत येनपुरे यांनी संबंधित बाबींवर तातडीने कारवाई करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
लेबल: क्राईम न्यूज, जनसंघर्ष न्यूज, समस्या, सामाजिक
शिंदखेडा | प्रतिनिधी
आज, दि. ५ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथील नगरसेवक राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती, शिंदखेडा तालुका यांच्या वतीने सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात समितीची स्थापना करण्यात आली असून, दि. १३ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथे भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील (एससी) विविध समाजबांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा दि. १३ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार येथून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी (शिंदखेडा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज तसेच विविध बहुजनवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस रामभाऊ माणिक (दोंडाईचा नगरसेवक), राहुल भाऊ पाटोळे (शिंदखेडा नगरसेवक), दीपक अहिरे (शिंदखेडा नगरसेवक), अक्षय चव्हाण (दोंडाईचा नगरसेवक), अरविंदकुमार मंगासे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन एकतावादी), संजय पाटोळे (जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय), कैलास आखाडे (तालुकाध्यक्ष), प्रवीण मनसे (युवक जिल्हाध्यक्ष), मनोज पानपाटील (पँथर सेना तालुकाध्यक्ष), जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले, रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील आंबेडकरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात लोकशाही मार्गाने व्यापक जनजागृती करत १३ जुलैचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, राजकीय न्यूज, समस्या, सामाजिक
लेबल: जनसंघर्ष न्यूज, विशेष, समस्या, सामाजिक
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक येथील देवळाली कॅम्प सिंधी पंचायत समिती हॉल येथे दि. २६ जून २०२६ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांनी विविध सामाजिक व प्रशासकीय मागण्यांचे निवेदन सादर केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थींना सदस्य म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशातील सर्व राज्यांमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय नाशिक महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कायमस्वरूपी नोकरभरती करावी, नाशिक महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व शाळांचे पुनर्वसन करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांना केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून संधी मिळावी यासाठीही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रिपाई (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे, संजय जाधव, आकाश घुसळे, रोहित सुनील भालेराव, विक्रांत बागुल, जेष्ठ नेते जमिलभाई सैय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर राजीव बिरसिंग रजोरा, भगवान कटारिया, राकेश बैद, संजय कल्याणी, निलेश बंगाली आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, सामाजिक
एरंडोल प्रतिनिधी - येथील भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आमदार चेतन वसावा यांच्यावर राजकीय षडयंत्रपूर्वक खोट्या केसेस मध्ये अडकवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची बातमी ऐकुन आमदार वसावा यांना अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यां ची एस आय टी चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना देण्यात आले.
निवेदनात आदिवासी आवाज या न्यूज चॅनलवरील व्हिडिओ तसेच वर्तमानपत्रातील मजकूर वरील माहितीचे अवलोकन केले असता गुजरात मधील डेडियापाडा येथील आदिवासी आमदार चेतन वसावा यांना 2023 मधील कथित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आमदार चेतर वसावा यांच्या सकट त्यांच्या सात दिवसाची बाळंतीण पत्नी व सात दिवसाचे निरागस बालकाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे वृत्तपत्र व सोशल मीडियावर माहिती फिरत आहे तसेच दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये काही महिन्यापूर्वी ते भाषणात सांगत आहेत की मला बीजेपी या राजकीय पक्षाकडून धमक्या येत आहेत ते मला त्यांच्या पक्षात सामील करण्यासाठी दबाव आणत आहे मी बीजेपी या पक्षात सामील नाही झालो तर मला फसवून संपवतील असा व्हिडिओ फिरत आहे म्हणून आम्हाला समस्त आदिवासी समाजाला व लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची एक मागणी आहे की सदर घटनेची एस आय टी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच वर्तमान मध्ये चेतर वसावा यांना वरील कोर्टात जामीन मंजूर करून त्यांना जेल मधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लश्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड,राजधर सोनवणे,करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे,बादल ठाकरे,करण बेलदार,आकाश ठाकरे,अजय बेलदार, कुणाल अहिरे, दिपक सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
लेबल: क्राईम न्यूज, जनसंघर्ष न्यूज, राजकीय न्यूज, राज्य, समस्या, सामाजिक
जनसंघर्ष न्यूज
महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभरात माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या मूळ उदिष्ट्यांशी व तरतुदींशी हे नियम विसंगत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) यांच्या मते माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मुलभूत लोकशाही हक्क असून तो दया किवा सवलत नसून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे नव्याने लागू करण्यात आलेले नियम मागे घेऊन माहितीचा हक्क सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन नियमांमुळे माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक जाचक अडथळे निर्माण झाले आहेत. (अर्ज शुल्क १० वरून ३० रुपये, माहिती मिळवण्यासाठी पर पेज २ वरून ५ रुपये,) अर्ज शुल्क, अपील शुल्क, व प्रतिपादन शुल्कात वाढ, माहिती मागण्याचे कारण सांगण्याची सक्ती, तसेच नागरिकत्वाचा पुरावा जोडण्याच्या अटीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २५ जून २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १०.०० ते ४.०० च्या वेळेत मुंबईतील आझाद मैदान येथे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आधी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यातील पदाधिकारी सदस्य यांनी हजारो इमेल राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना मेल पाठवण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील नेते, आमदार, खासदार यांना निवेदने दिली जात आहेत.
या आंदोलनासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे (फेडरेशनचे) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी समविचारी संस्था, संघटना, पत्रकार बांधव व नागरिकांनी ही मुख्यमंत्री व प्रधान सचिव सामान्य प्रशासन यांना मेल पाठवावेत. तसेच आझाद मैदान येथे होणारया आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे (फेडरेशनचे) संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर, राज्य उपाध्यक्ष शेखर कोलते, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव वाघ, किरण धुमाळ, यांनी केले आहे.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, भ्रष्टाचार, महाराष्ट्र, समस्या, सामाजिक
धुळे, दि. 20 जून — धुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने अमृत 2.0 योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सैनिक कॉलनी येथील जलकुंभ व पंपिंग स्टेशनचे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धर्मयोद्धा अनुप भैय्या अग्रवाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी धुळे शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मायादेवी परदेशी तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास नगरसेवक सुभाष सुकलाल जगताप, नगरसेवक ललित गंगाधर माळी, नगरसेविका सौ. उज्वला रंजीत भोसले व नगरसेविका सौ. योगिता संजय कुटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिक कॉलनी येथील जलकुंभ अनेक वर्षांपासून उभारलेला असला तरी पंपिंग स्टेशनच्या अभावामुळे त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नव्हता. पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.
या जलकुंभामुळे प्रभाग क्रमांक १ मधील नगावबारी परिसर, कदमबांडे नगर, सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केसर पार्क तसेच झेंडा चौकापर्यंतच्या विविध कॉलनींना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी समान वितरण क्षेत्र असल्याने या उंच भागांमध्ये पाणी कमी दाबाने अथवा उशिराने पोहोचत होते. मात्र धुळे शहरातील सर्वात उंच ठिकाणी उभारलेल्या या जलकुंभामुळे आता संबंधित भागात एक दिवसाआड नियमित, मुबलक व विनाअडथळा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
यावेळी आमदार अनुप भैय्या अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी अमृत 2.0 योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांचा उल्लेख करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून धुळे शहराच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, राजकीय, सामाजिक
जनसंघर्ष न्यूज
धुळे, प्रतिनिधी :- शहरातील गरुड मैदान येथे आज (20 जून 2026) सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
योग दिन संयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे चार हजार नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शासकीय व खासगी संस्थांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. योगाभ्यासाद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संयोजक ओमप्रकाश खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले, तर योग प्रात्यक्षिकांचे संचालन डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
धुळे - धुळे महानगरपालिका नालेसफाईतील भ्रष्टाचार संदर्भात आम्ही हे तिसरे पत्र वजा निवेदन आपणा स्वतःला मंत्रालयात भेटून देत असून यापूर्वीच्या तक्रारीची दखल घेवून आपण दि. 12/5/2026च्या पत्रान्वये आयुक्तांना सदर भ्रष्टाचार व गंभीर अनियमिततेच्या संदर्भात चौकशी करुन तक्रारदारांना परस्पर कळविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.
आमची तक्रारच मुळात आयुक्तांविरुध्द आहे. कुंपणच शेत खात आहे. धुळ्याची कचरासफाई 2024 सालापर्यंत 25 लाख रु.त होत असतांना सन 2025साली 55 लाखाचे नालेसफाईचे टेंडर
निघाले. नालेसफाई 10-20% देखील होत नव्हती. नालेसफाई हा महानगरपालिकेच्या तिजोरीवर डाका घालण्याचा प्रकार आहे. सन 2025 साली 55 लाखाचे टेंडर निघाले... नालेसफाई न करता 55 लाख हडप केले. तोंडाला रक्त लागल्याने यावर्षी प्रथम 1.49 कोटीचे टेंडर निघाले. परंतु चार नगरसेवकांना हे टेंडर घ्यावयाचे असल्याने समर्थ कन्स्ट्रक्शन यांची निविदा सर्वांत कमी दराची आल्याने, त्यांची पंचायत झाली. या ठेकेदारास मॅनेज करु न शकल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना हाताशी धरुन निविदा रद्द करण्यास भाग पाडले. निविदा रद्द करण्याचे कारण मुळीच संयुक्तीक व कायदेशीर नाही. निविदा का रद्द केली ? सर्वांत आधी या निविदा रद्द करण्याची अनियमितता व आयुक्तांनी केलेल्या अधिकाराचा दुरुपयोगाची चौकशी आवश्यक आहे.
फेरनिविदा काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तेव्हा त्याच रकमेची निविदा प्रसिध्द करणे कायद्याला धरुन होते. मात्र या ठेक्यात स्वत:ला 20% पार्टनर करुन घेतले. ते चार नगरसेवक व आयुक्त असे 5 जण या नालेसफाईच्या कामात पार्टनर आहे. ही चर्चा शहरात खुलेआम होतेय. आयुक्त पार्टनर झाल्याने त्यांना सदरची 1.49 कोटीची निविदा थेट 2.49 कोटी काढावी लागली.
फेरनिविदा काढावयाची असतांना रकमेत बदल अर्थात 2.49 कोटीचे टेंडर फक्त आयुक्त पार्टनर झाल्यामुळेच काढावी लागते, जे मुळात बेकायदेशीर होय. ही दुसरी गंभीर अनियमितता आहे.
शिवाय शहरात तेच 7 मुख्य नाले व 12 उपनाले असतांना लांबी, रुंदी, खोली तेवढीच असतांना फेरनिविदेमध्ये 1 कोटी रुपयाची वाढ कशी होवू शकते ?
4 सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व आयुक्तच या कामात पार्टनर असल्याने, आम्ही यापूर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेणे शक्यच नव्हते. उलट गेल्या 2-3 दिवसांपासून वृत्तपत्रांना 80% नालेसफाई झाली अशी खोटी माहिती देवून नागरिकांची व शासनाची फसवणूक करत आहेत. वृत्तपत्रांनी 80% नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी पहाणीला गेलो असता,मोतीनाला व सुशी नाला येथील पुलाजवळ थोडीफार सफाई करुन म्हणजे 500 मीटर देखील सफाई झालेली नाही. हे नाले 4-5 किमी लांबीचे आहेत. दैठणकर नगर, सिस्टेल क्लासेस, सिव्हील हॉस्पिटल, संघमा चौक, सिंचन भवन मागील नाला, जीटीपी कॉलनी नाला पूर्ण कचरा, मेलेले जनावरे पडलेले आढळले. तेथील नागरिकांनी इकडे कधीही नालेसफाई झाली नाही असे सांगितले. हे सर्व पुरावे, फोटो, व्हीडीओ आम्ही चौकशी दरम्यान सादर करु शकतो. इतर जे 11-12 उपनाले आहेत, त्याकडे हे लोक फिरकले देखील नाहीत. 49 कि.मी. चे नालेसफाईचे इस्टीमेट असतांना 4-5 किमी.ची नालेसफाई देखील झाली कि नाही ही शंकाच आहे.
ज्या ठिकाणी नालेसफाई म्हणजे थातुर-मातुर घाण, गाळ काढून नाल्यालगतच ढिगारे 15 दिवसांपासून पडून आहेत, ते उचलले जाणार नाहीत. पाऊस पडला म्हणजे ती सर्व घाण पुन्हा नाल्यात जमा होईल !
आमची नम्र विनंती आहे, अत्यंत जलद गतीने नाले सफाई कामाच्या चौकशीसाठी तज्ञ लोकांची समिती नेमून सर्वप्रथम फुगीर इस्टीमेट 2.49 कोटीचे ऑडीट करावे. इस्टीमेट मधील तरतूदी, वाहने, मशीन, साहित्य न वापरता फक्त जेसीबी मशीनने कचरा नाल्याच्या बाजुलाच ढकलण्यात आला आहे. नाल्याचे खोलीकरण तसेच रुंदीकरण न करता थातुर-मातुर व तकलादू काम ते देखील 15-20% पेक्षा जास्त नसेल ! इतकी लूट दिवसा-ढवळया होत आहे. किती टन गाळ, घाण काढणे अपेक्षित होते. नियमानुसार (डीएसआर) दर, निघालेला कचरा यांचे परिक्षण करावे. विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी.
आयुक्तांनी केलेल्या टेंडर भ्रष्टाचाराची चौकशी करावी. स्वत:च पार्टनर असल्याने काम न करताच बिले काढणे सोयीचे व्हावे म्हणून 80% नालेसफाईची बोंब मारणार्या आयुक्तांना बडतर्फ करावे, हे भ्रष्ट अधिकारी आहेत. यांचे पूर्वीचे रेकॉर्ड चांगले नसून हे अनेकदा अॅण्टीकरप्शन विभागामार्फत ट्रॅप झाले आहेत. म्हणून आपल्या स्तरावरुन नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते सौ.शुंभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी थेट मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, अप्पर सचिव नगरविकास यांना प्रत्यक्ष भेट घेऊन केली, या संदर्भातील तब्बल १२१ रंगित गुगल मॅप छायाचित्रे व चलचित्र फिती देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या,या संदर्भात लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिले.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, भ्रष्टाचार, राजकीय न्यूज, समस्या, सामाजिक
जनसंघर्ष न्यूज
परळी वैजनाथ, प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील युवक तोहिद केरातोवाण पगण यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी जनकल्याण मानवता मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष फिरोज गफ्फार शेख यांनी ही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तोहिद केरातोवाण पगण यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व जलद चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच हत्येमागील संपूर्ण कट, कारणे व संबंधित बाबींचा तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे तसेच पीडित कुटुंबास आवश्यक संरक्षण व मदत उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
लेबल: क्राईम न्यूज, जनसंघर्ष न्यूज, सामाजिक
जनसंघर्ष न्यूज
वृत्त प्रतिनिधी : धनंजय गाळणकर
धुळे : शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक वहिवाटीच्या जागेवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार तक्रारी, अर्ज आणि निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अर्जदार नितीन सुभाष शिंदे व परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत १६ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास १७ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनानुसार, रमाबाई आंबेडकर नगरातील एका सार्वजनिक बोळातील वहिवाटीच्या जागेवर कथित अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा, मोजमाप आणि मार्किंग यांसारख्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक शेराही देण्यात आला होता. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई अद्याप झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, २१ मे रोजी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध असतानाही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई टाळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. "वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांना मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे," असे नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, १६ जून २०२६ पर्यंत संबंधित अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या घटनेस जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन तातडीने हालचाल करून अतिक्रमणाविरोधात कारवाई करणार का, याकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, समस्या, सामाजिक
लेबल: क्राईम न्यूज, जनसंघर्ष न्यूज, सामाजिक
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, समस्या, सामाजिक