अतिक्रमणावर कारवाई करा, अन्यथा १७ जूनला आत्मदहन; नितीन शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम
जनसंघर्ष न्यूज
वृत्त प्रतिनिधी : धनंजय गाळणकर
धुळे : शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक वहिवाटीच्या जागेवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार तक्रारी, अर्ज आणि निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या अर्जदार नितीन सुभाष शिंदे व परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच धुळे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत १६ जूनपर्यंत कारवाई न झाल्यास १७ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनानुसार, रमाबाई आंबेडकर नगरातील एका सार्वजनिक बोळातील वहिवाटीच्या जागेवर कथित अतिक्रमण करून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा, मोजमाप आणि मार्किंग यांसारख्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक शेराही देण्यात आला होता. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई अद्याप झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, २१ मे रोजी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध असतानाही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई टाळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. "वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांना मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे," असे नितीन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, १६ जून २०२६ पर्यंत संबंधित अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या घटनेस जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन तातडीने हालचाल करून अतिक्रमणाविरोधात कारवाई करणार का, याकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

